
१५ मिनिट टीकणारी स्मृती घेउन प्रेक्षक चित्रपट बघायला येतात ह्या समजातुन आमिर खानचा नविन गझनी हा चित्रपट बनवला आहे. समोरच्या प्रसंगात काय चालले आहे ह्याची १५ मिनिटापुर्वीच्या चित्रपटाशी सांगड घालायचा प्रयत्न केलात तर तुम्ही फसलात. कशाचा कशालाही आगापीछा नाही. पोलिस अधिकारी बसपेक्षा जोरात काय धावतो, घरी गेल्यावर नायकाला बदड बदड बदडुन बांधुन घातल्यावर त्याची डायरी काय वाचत बसतो, आणि पुढची पाने सापडली नाहीत म्हणून एकदम 'आता मला पुढे काय झाले त्याची गोष्ट सांग' असा हट्ट काय धरतो, सगळाच आनंदी आनंद.
भरपुर बजेट घेउन मी आता वाट्टेल ते बनवणार, कथा कशीही वळणे घेणार कॅमेरे कुठेही लावणार पटकथेत काहीही घुसडणार असे मनाशी ठरवुन दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवला आहे. अर्धा अधिक चित्रपट संपेपर्यंत तुम्ही चिकाटी धरलीत तर चित्रपटातल्या नायका प्रमाणे कुणीतरी आपल्याही डोक्यात एक रॉड घालुन कायमचे मतीमंद बनवावे असे वाटायला लागते. बरं बौद्धीक दिवाळखोरीची हद्द म्हणजे हे सगळे एका दुसर्याच चित्रपटावरुन उचलेले आहे, आणि हा चित्रपट एकदा दक्षीणेत जसाच्या तसा बनवुन झालेला आहे. चित्रपटाची कथा वगैरे जाणुन घ्यायच्याही फंदात पडू नका. आमीर खानच्या गोंदवण्याची देखिल फुकटची हवा केलेली आहे. हे गोंदवणे मूळ इंग्रजी चित्रपटात आहे म्हणून दिग्दर्शकाने इथेही आणले पण १५ मिनिटांनी तो स्वतःच विसरुन गेला असावा असे का केले ते. कारण चित्रपटाच्या सुरुवातीला शर्ट काढुन बॉडी दाखवण्यासाठी हे 'गोंदवलेकर महाराज' उभे राहतात खरे पण पुढे त्या गोंदवण्याचा कथा विस्तारात फारसा काहीही संबध नाही. असा इथे कशाचाच कशाशी संबध नाही तर गोंदवण्याची फिकिर तरी कशाला म्हणा.
चित्रपटाच्या शेवटी शेवटी तर दिग्दर्शक आता काय काय करामत्या करु शकेल ह्याचे आडाखे बांधण्यातच आम्ही वेळ घालवला. उदा. देमार हाणामारी, दिसेल त्याला उचलुन आपटून शेवटी एकदाचा हा गझनी त्या सिंघानियाच्या तावडीत सापडाल्यावर तो त्याला मारुन न टाकता, त्याच्या डोक्यात देखिल नेमक्या अचुकतेने रॉड घालुन त्याची देखिल स्मृती भ्रष्ट करेल आणि वर 'तुम्हे मारकर छुटकारा दिलानेसे अच्छा तो मै तुम्हारा '१५ मिनिट मेमरी' वाला गेम बजाके तुम्हारी जिंदा लाश देखना चाहता हू!' असला काहीतरी डायलॉग मारुन उर्वरीत आयुष्य दोघेही अंगभर गोंदवुन गोंदवल्याला जाउन राहतील असले काहीतरी भन्नाट आडाखे मी बांधत होतो. पण चौफेर उधळालेली दिग्दर्शकाची कल्पना शक्ती आमच्या ह्या कल्पकतेसमोर थिटी पडली. आणि शेवट गझनीला ठार मारुनच झाला. (चित्रपटाच्या शेवटी गझनी सिंघांनियाला मिळेल का? वगैरे उत्कंठा ताणुन घेणार्यांसाठी 'स्पॉइलर अलर्ट' बरंका)
बॉलीवुड मध्ये चित्रपट निवडण्यात सगळ्यात चूझी म्हणून ओळखल्या जाणार्या आमिर खानने हा चित्रपट का निवडला असावा हे न उलगडेले कोडे आहे. त्याच्या डोक्यात खरोखरच रॉड घालुन हा चित्रपट त्याला दाखवला असावा का? अशी एक शंका मनात येते. त्याचा ह्यातील अभिनय बघता त्याला कथा नायकाला स्मृतीभ्रंश नसुन बुद्धीभ्रंश झाला आहे असा त्याचा गैरसमज झालेला वाटतो. बॉडी बिल्डींगचे वगैरे मोप कौतुक झाले असले तरी मला त्यात काही तितके विशेष वाटले नाही. मुळात उंचीत मार खाल्ल्यामुळे नुसतेच ८ पॅक बनवले म्हणून तो अवाढव्य राक्षसी वगैरे अजिबात वाटत नाही. मागे कमल हासनचा 'अभय' नावाचा एक टूकार चित्रपट आला होता त्यात त्याने बनवलेली बॉडी ह्याहुन कितीतरी सरस होती. असो तसेही 'राजा हिंदुस्तानी', 'मेला' वगैरे महान चित्रपट बघीतल्यावर आमिर खानच्या बाबतीत 'नावाजलेला गुरवा देवळात जाउन ***' ह्या म्हणीचा प्रत्यय आलाच होता आता आणखी एक दाखला मिळाला इतकेच.
1 comments:
absolutely correct!! Ghajini is totally a waste of time. I felt like watching Ghulam action again. And that "Rab ne bana di jodi" is also useless...what's happening?? After Chak De India there was not a single movie i liked.
Post a Comment